आज आहे गुरुपौर्णिमा ! आपल्या या ब्लॉगचा दूसरा वाढदिवसआणि या खास दिवशी माझे शेअरमार्केटला त्रिवार वंदन ! शेअरमार्केटनेच मला शेअरमार्केटमध्ये विश्वासाने वावरायला शिकविले.मला वेळोवेळी सावरले. प्रोत्साहन दिले. तडजोड कशी करावी, निर्णय कसे घ्यावेत हे सांगितलेआणी तेही विनामूल्य. त्यामुळेच ज्याला कुणाला मार्केट शिकायचे असेल त्यांना मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा होती.
ही माझी इच्छा मी माझ्या मुलाकडे (श्री.सुरेंद्र प्रकाश फाटक) व माझ्या सुनेजवळ (किरण गोवेकर) व्यक्त केली .त्यांनी मला ब्लॉग लिहिण्याचा मार्ग सुचविला. मी संगणक क्षेत्रातील नाही. मला या क्षेत्रांतला ओ की ठो समजत नाही.त्या दोघांनी मार्ग सुचविल्यामुळेच माझी इच्छा पूर्ण झाली.मी आपणासर्वांना मार्गदर्शन करू शकते. ब्लॉगच्या माध्यमांतून भेटू शकते. संपर्क साधू शकते. त्या दोघांशिवाय हा गड चढणे मला शक्य नव्हतेहे मला आवर्जून नमूद करावयाचे आहे.च्याच मुळे माझी इच्छा पूर्ण झाली हे कौतुकाने आणि अभिमानाने सांगावयाचे आहे.
आज मी तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणी माझे अनुभव सांगणार आहे.
मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये रोज जाऊ लागले तेव्हाची ही कथा. मला मागे बसून काहीएक दिसत नसे. “‘madam’ ना दिसत नाही, पुढे जागा द्या. शाळा सुरु झाली” असे टोमणे ऐकू येत. मी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही.त्यांनी माझ्यासाठी कोपरयातली एक खुर्ची रिकामी ठेवली आणि मला सांगितले
“ही खुर्ची तुमच्यासाठी आरक्षित आहे.” नंतर हळूच एक-दुसऱ्याला सांगू लागले ,खाणाखुणा करू लागले.
“त्या जागी बसलं की घाटा होतो. एकदां घाटा झाला की madamला बरोब्बर समजेल, मार्केटमध्ये व्यवहार करणेच बंद करतील.मग आहेच आपले राज्य “.
मी आपले मुकाटपणे त्यांनी ठरविलेल्या जागी बसून व्यवहार करू लागले. मला फायदाही होऊ लागला. तेव्हां ते कुजबुजू लागले
“madam आता मालदार पार्टी होणारअसं दिसतंय.त्या खुर्चीवरसुद्धा madam ला फायदा होतो आहे”.
तेव्हा त्यांचे डोळे उघडले. फायदा किंवा तोटा तुम्ही कुठे बसून व्यवहार करता यावर अवलंबून नाही.योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हेच खरे कारण असते.
त्यावेळी मी मार्केटमध्ये थोडीशी चाचपडत होते. फारसा अनुभव नव्हता. फारसं काही कळत नव्हतं, कष्ट व काटकसर या दोनच गोष्टी माहिती होत्या. पुरेसं भांडवल नव्हतं आणि कर्ज काढून भांडवल उभे करण्याचे धैर्य नव्हतं.कोणता शेअर चांगला आणी कोणता शेअर वाईट हे सांगणारही कोणी नव्हतं..
गिनी सिल्क मिल्सचे १००० शेअर्स २१.७० रुपये भावाने विकून थोड भांडवल जमा झालं. तेव्हढ्याच पैशांत सौदा पटवण एवढीच काय ती प्राथमिक अक्कल! शेअरमार्केटचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून व्यवहार करणारी कुणीही व्यक्ती मला ऑफिसमध्ये आढळली नाही.टी.व्ही वर सुद्धा एखादा शेअर वाढल्यानंतर किंवा पडल्यानंतर तो एवढा कां वाढला किंवा कां पडला याची कारण शोधतात. माणूस मरून गेल्यानंतर कारण शोधून काय उपयोग? व्यवहार करण्यापूर्वी जर माहिती मिळाली तर काही उपयोग!!
झालं काय कि ASHOK LEYLANDच्या शेअर्सचा भाव पडत होता. भाव झाला होता १८.०५ रुपये. मी १८रुपये दराने १००० शेअर खरेदीची ऑर्डर लावली. मार्केट बंद झालं तरी ऑर्डर पुरी झाली नाही. शेअर्स मिळाले नाहीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच भावाला ऑर्डर लावली.दुपारचे तीन वाजले तरी शेअर्स मिळाले नाहीत तेव्हां काका म्हणाले
“पांच पैशाने काय इकडचं जग तिकडं होणार आहे. १८०००रुपयाच्या ऐवजी १८०५० रुपये द्यावे लागतील इतकेच ! शेअर्स विकताना ते ५ पैसे वसूल करां. समजा तूम्ही ३०.५०रुपयाला विकणार असाल तर हे पांच पैसे त्यांत मिळवून ३०.५५ रुपयाला विका म्हणजे झालं”
पण त्या वेळेला एवढा सारासार विचार मला सुचला नाही. मी माझा हट्ट सोडला नाही. त्या शेअर्सचा भाव वाढतच राहिला शेअर मला खुणावत राहिला. पण वेळ निघून गेल्यामुळे उपयोग काहीही नव्हता. त्यामुळे शेअरमार्केटमध्ये हट्ट हेका किवा ज्ञानाचा दुराभिमान उपयोगाचा नाही निर्णयांत लवचिकता ठेवावी लागते हे चांगलेच समजले.
तो काळ होता शुगरसेक्टरच्या तेजीचा. त्यावेळी मी वेगळी वाट चोखाळली. शुगर सेक्टरमध्ये कोणकोणते शेअर्स आहेत ते शोधून काढले.त्या शेअर्समध्ये उलाढाल करायला सुरुवात केली. फायदाही होऊ लागला. मी बलरामपुर चीनीचे शेअर्स घेतले होते. माझ्या हिशोबाप्रमाणे १०% फायदा व १ % खर्च. म्हणजे शेअर्सचा भाव खरेदीभावापेक्षा ११ % वाढला की विकावयाचे या सूत्रानुसार मी शेअर विकले. शेअर विकल्यानंतर ‘INSTRUCTION SLEEP “ दुसरे दिवशी द्यावी लागते. परंतु दुसऱ्या दिवशी अक्राळविक्राळ पाऊस पडत होता. गाड्या बंद होत्या. फोर्टला बँकेत स्लीप द्यायला जाणे शक्य नव्हते.मी माझ्या मिस्टरांना सांगितले तुम्ही सुद्धा तडफडाट करीत स्लीप द्यायला जाऊ नका . पाऊस खूप आहे अडकून पडाल.
पण काय झाले कोणास ठाऊक, कुणीतरी ही अडचण ‘STOCK EXCHANGE’ ला कळवली. परंतु मार्केट संपण्याच्या आधी सुचना देण्यात आली की स्लीप देण्याची मुदत एक दिवस वाढवली आहे.माझा DEMAT अकौंट होता बँकेत. एक दिवस वाढवला आहे याची खबर बँकेला नव्हती त्यामुळे बँकेनी स्लीप घेण्यास नकार दिला. बँकेला पटवता पटवता नाकी नऊ आले. शेवटी काकांनी बँकेत फोन करून CIRCULARचा रेफरन्स नंबर सांगितला. STOCKHOLDING CORPORATION कडे चौकशी करायला सांगितली. बँकेनी चौकशी केली व सरतेशेवटी त्यांची खात्री पटल्यानंतर माझी स्लीप घेतली. एक दिवसाची सवलत मिळाली नसती तर AUCTION झाला असतां. खरोखर देवानेच मला वाचवले असे मला वाटले. ज्यावेळी आपली काहीही चूक नसते तेव्हां देव आपल्याला वाचवतो याची मला खात्री पटली.
अशा प्रकारे मार्केटने मला शिकवले, सावरले आणि वेळी फटकारले सुद्धा! तुम्हाला मी किती सांगू काय काय सांगू आणी कसं सांगू असं मला झालय.अनेक आठवणींची दाटी झाली आहे. मार्केट म्हणजे पैसा, मार्केट म्हणजे लक्ष्मीचे माहेरघर हे अगदी खरे आहे. आपल्या कल्पनेतल्या अनेक गोष्टी पैसा मिळाल्यास साध्य होऊ शकतात, कल्पना सत्यांत उतरू शकतात.परंतु शेअरमार्केटच्या झाडाखाली कधी उभे राहावे व कधी दूर व्हावे हे समजले पाहिजे.सावलीसाठी झाडाचा आसरा घ्या परंतु पावसापासून बचाव होण्यासाठी झाडाखाली उभे राहू नका. झाडाची फांदी डोक्यावर पडू शकते, वीज पडू शकतेहे लक्षांत घेतले घ्या. नंतर झाडाला दोष देण्यात काही अर्थ नाही !!
आज दोन वर्ष ब्लॉगच्या माध्यमातून आपण भेटत आहोत, मी माझे बरेच अनुभव तुम्हाला सांगत आलीये, तुमच्यापैकी कुणाला काही अनुभव आला असल्यास तुम्हीसुद्धा तो अनुभव सांगू शकता. त्यामुळे शेअरमार्केटचा व्यवसाय करणाऱ्यांना बाकीच्यांना मदत होईल आणि शेअरमार्केटचा हा कल्पतरू बहरेल.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Monthly Archives: July 2014
भाग ४३ – रुक जाना नहीं, तू कही हार के !!
गृहिणी ते शेअरमार्केट हा आपला प्रवास अजून संपलेला नाही. हा प्रवास खूप लांबलचक आहे. प्रवासांत काही लहान मोठी स्टेशने येतात तश्या माझ्या प्रवासात वाचकांच्या काही शंका आल्या होत्या. काही गोष्टी समजलेल्या नव्हत्या. काही बाबतीत मी दिलेली माहिती त्यांना अपुरी वाटली. त्यामुळे त्यांनी प्रेमाने मला मध्येच थांबवून त्यांना हवी होती ती माहिती विचारली शंकांचे निरसन करावयास सांगितले. मलासुद्धा माहिती सांगताना आणी शंका निरसन करताना आनंदच झाला.माझा ब्लोग वाचून लोकांना उपयोग होतो आहे हे समजलं. आता २९ व्या भागापासून शेअरमार्केटचा प्रवास पुढे चालू करू या.
मी माझे एच. डी एफ सी. चे शेअर्स विकले व गिनी सिल्कचे शेअर्स थोडे थोडे करून विकणे सुरूच ठेवले. जसा जसा जास्त जास्त भाव मिळेल तसे तसे वरच्या वरच्या भावाला विकत राहिले. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. अडकलेला पैसाही थोडा थोडा मोकळा झाला. व दरवेळी पहिल्यापेक्षा जास्त भावाला विकत असल्याने सरासरी चांगली होऊन भाव चांगला होत गेला.यालाच मार्केटच्या भाषेत ‘STAGGERED BUYING OR SELLING’ असे म्हणतात.
विक्री कशी करायची याची प्राथमिक माहिती मला मिळाली होती .जास्त डोके चालवण्याएवढा माझ्याजवळ वेळ होताच कुठे? कारण शेअरमार्केटचा व्यवसाय करण्यासाठी मला भांडवलाची गरज होती.आता माझ्याजवळ थोडफार भांडवल तयार झालं होतं. ‘बोलाचा भात बोलाची कढी’ संपली आणि आता खरा भात करायची वेळ आली. भात चांगला झाला तर सगळे पोटभर जेवतील, भात करपला , कच्चा राहिला किंवा भाताची खीर झाली तर नावं ठेवतील व सर्वजण उपाशी राहतील. त्यामुळे प्रत्येक पाउल जपून टाकण भाग होतं
किती भांडवल गुंतवायच ? जेवढ भांडवल जमा झालय तेवढ सगळ गुंतवावं कि ५०%आता गुंतवून बाकीचे थोडे दिवसांनी मार्केट पडलं तर गुंतवावं? असा प्रश्न पडला. अशावेळी आमच्या ऑफिसमध्ये लोक ज्या गप्पा मारत त्याचा मला उपयोग झाला. ऑफिसमध्ये एक गोष्ट होत असे . कुणीही कधीही घरगुती गोष्टी बोलत नसत,कुणाचा अपमान करण किंवा कुणाला कमी लेखण नाही, किंवा मला पैसे मिळाले त्याला मिळू नयेत अशी संकुचित दृष्टी मला आढळली नाही.
मी आपली फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकून किंचित हसून प्रतिसाद देत असे. पण मला त्या गप्पांचा उपयोग झाला. “अरे, १०० शेअर्स एकदम कां घेतलेस. २५-२५ च्या गटाने घ्यायचे होतेस. मार्केटचा अंदाज घेतला असतास तर बरे नाही कां? आज दुपारी ‘I. I. P’ चे आकडे येणार तेव्हा जर मार्केट पडले तर स्वस्त पडतील वगैरे वगैरे.
अहो, तेव्हा मला ‘I. I. P.’ ‘INFLATION ‘ ‘CAD’(CURRENT ACCOUNT DEFICIT ) म्हणजे काय हे काहीच कळत नव्हते. पण मला एवढे मात्र कळले की खरेदी छोट्या छोट्या लॉटमध्ये करावी.मार्केटचा अंदाज घेवून करावी. आणी मार्केटच्या अस्थिरतेचा फायदा करून घ्यावा. मार्केटमधील अस्थीरतेलाच “MARKET VOLATILITY ‘ असे म्हणतात.
त्याचबरोबर मार्केट पाहणे ऐकणे निरीक्षण करणे या सवयींचा उपयोग झाला.
काही शेअर रोज किती वाढतात किंवा मार्केट पडले तर किती पडतात किंवा शेअर्सचे जे निर्देशांक (SENSEX, NIFTY ) आहेत त्यांचा शेअरच्या किमतीतील वाढीशी किंवा कमी होण्याशी काही संबध जोडता येतो कां ? हे मी माझ्या सोयीसाठी निरीक्षणाने पाहिले. शेअर्सच्या खरेदीशी या सर्व गोष्टींचा फार घनिष्ट संबंध आहे.
मी तुम्हाला कित्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे पुन्हा सांगते शेअर खरेदीचा उद्देशच फायदा घेवून विकणे हा असतो. जतन करणे, म्युझियममध्ये ठेवणे हा कदापि नसतो. ‘TO MAKE MONEY’ हाच उद्देश हेच अंतिम ध्येय व तुम्हाला पैसा किती सुटला यावरच तुमच्या यशाची मोजदाद होते.
इथे एक गोष्ट तुमच्या कानांवर घातल्याशिवाय मला राहवत नाही. मी ऑफिसमध्ये जाताना किंवा घरी येताना काही गरजेच्या गोष्टी खरेदी करीत घरी येत असते. हे माझ्यासारख्या गृहिणींना काही नवीन नाही. घरांत काय संपले आहे काय उद्यासाठी हवे आहे., घरातील मुलांच्या मागण्या काय आहेत हे सर्व डोक्यांत ठेवूनच गृहिणी वावरत असते. ऑफिसच्या बाहेरच बसणाऱ्या फळवाल्याकडून मी फळे घेत असे. कारण त्याचा दर वाजवी असे. मालही चांगला असे. तो माझ्या ओळखीचा झाला होता. मी त्याला एकदा विचारले “तुला एवढ्या भावांत विकणे परवडते कसे? “ तेव्हा तो म्हणाला “फायदा किती घ्यावयाचा हे माझे ठरलेले असते. आज कोणता माल लावायचा , किती किमतीला मिळायला हवा, किती किमतीला विकावा, खर्च जाऊन किती पैसे मिळाले पाहिजेत हा हिशोब करूनच मी माल घेतो .२-३ तास बसतो. दुकाने उघडण्याच्या आंत माझी पाटी रिकामी मी पण रिकामा. माल चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकही फिक्स्ड असते “.
यशाचे केवढे मोठे गणित तो फळवाला मला कळत-न-कळत सुचवून गेला होता. हेच तंत्र बद्या–चढ्या भाषेत बोलायचे तर वाजवी नफा ठेवायचा, टर्नओव्हर जास्त हवा, भांडवल जास्त लवकर बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा गुंतवता येतं. व तेवढेच भांडवल वापरून जास्तीतजास्त फायदा मिळवता येतो. म्हणजेच १००००रुपये गुंतवायचे ठरवले तर १००रुपये प्रती शेअर किमतीचे शेअर खरेदी करायचे. महिन्याभरांत विकायचे व पुन्हा फायदा बाजूला काढून घेवून पुन्हा १००००रुपये गुंतवायचे. म्हणजेच आपण वर्षाला १,२०,००० रुपये गुंतवू शकतो.प्रत्येक महिन्यांत १००० रुपये फायदा झाला तर वर्षाअखेरीला १००००रुपयांवर १२०००रुपये निव्वळ फायदा होऊ शकतो.
म्हणजे ज्यावेळी आपल्याजवळ भांडवल कमी असते तेव्हा ‘QUICK ENTRY, QUICK EXIT ‘ करून पुन्हा पुन्हा तोच पैसा वापरून जास्त फायदा मिळवता येतो. त्यासाठी योग्य वेळ व योग्य वेळीच योग्य निर्णय ताबडतोब घेणे यावरच यशाचे गणित अवलंबून असते. त्याचबरोबर त्या फळवाल्याने अजून एक गोष्ट सांगीतली ती सुद्धा विचारात घेण्यासारखीच!
‘माल चांगला म्हणजे गिऱ्हाईकही फिक्स्ड’ म्हणजेच शेअरमार्केटच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास चांगले शेअरच घेतले पाहिजेत. म्हणजेच कंपनीच्या अस्तित्वाबद्दल, तिच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल कोणत्याही प्रकारची शंका खरेदीच्या वेळीतरी आपल्या मनांत असू नये.नाहीतर आज कंपनी अस्तित्वांत होती उत्पादन तसेच विक्री जोरांत होती, पण थोड्याच दिवसांनी बंद पडली. शेअर्सचा भाव २०पैसे झाला.म्हणजेच ‘तेल बी गेलं तूप बी गेलं आणी हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारची खात्री झाल्यावरच खरेदी करावी. नाहीतर जमीन जशी धुपून नाहीशी होते तसे भांडवल संपून जाईल व हातांत करवंटी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या भांडवलाची जपणूक करणे सर्वात जास्त महत्वाचं…
अजून पुढे बरंच काही बोलायचं , पण ते पुढच्या भागात …
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा